तो गोकुळ सोडुन गेला
वाटते लौकिकार्थाने
येथेच बासरी त्याची
येथेच राहिले गाणे
विरहाची भक्ती सोपी
सारखी आठवण येते
वेदना जेवढी उत्कट
आनंद तेवढा देते
मी स्वतःस विसरुन जाते
तेव्हा तो येथे येतो
मी भानावर आले की
तो पुन्हा नाहिसा होतो
तो येथे आणत नाही
कुठल्या युद्धाची धूळ
ती तशीच वाजत असते
मुरलीची मंजुळ धून
एकरूप झाली ह्रदये
मग कसली ताटातूट?
तो आहे अथवा नाही
हे देहापुरते द्वैत
लोकांना लाखो शंका
पण राधेला हे कळते
देवाच्या अवताराला
देहाचे बंधन असते
© भूषण कुलकर्णी